सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजिक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षक आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकीक शिवाजी महाराजांच्या काळात होता.

मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण कि.मी. अंतरावर असलेल्या खडकाळ बेटावर हा किल्ला बांधण्यात आला आहे.

इ.स. १६६५ मध्ये हा किल्ला शिवाजी महारांजी स्वत:च्या देखरेखीखाली बांधला. या बांधकामासाठी त्यांनी १०० पोर्तुगीज तज्ज्ञांचे सहाय्य घेतले होते. असं म्हणतात की, सुमारे ४८ एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या या जलदुर्गासाठी शेकडो कारागीर व कष्टकरी तीन वर्षे अहोरात्र झटत होते.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सभोवती सुमारे ९ मीटर उंच, ३.६ मीटर रूंद व सुमारे २ मैल परिघाचा कोट बांधण्यात आला आहे. किल्ल्यावर अनेक टेहळणी बुरूज असून तटाला लागून पन्नासहून अधिक विस्तृत बुरूज आहेत. शत्रुपक्षावर तोफांचा भडीमार करण्यासाठी या बुरूजांचा उपयोग केला जात असे. आजही या बुरूजांवर जुन्या तोफा पहायला मिळतात. पुढे इ. स. १८१२ मध्ये हा अजिंक्य किल्ला ब्रिटिशांनी हस्तगत केला.

किल्ल्यात शिवाजी महाराजांची वीरासनात बसलेली मूर्ती असलेले मंदिर असून आजही त्या मूर्तीची लोक पूजा करतात. हे मंदिर शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांनी बांधले.