घन कचरा व्यवस्थापन - १

प्रास्तविक
वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यात घन कचऱ्याचे एकत्रीकरण व त्याची विल्हेवाट ही एक मोठी खर्चाची तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्वाची समस्या बनली आहे. लोकसहभागाने या समस्येवर तोडगा काढणे ही एक काळाची गरज आहे. यादृष्टीने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान ही अतिशय स्वागतार्ह योजना शासनाने सुरू केली आहे. त्यात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेणे आवश्यक आहे. असे झाले तर ही समस्या, समस्या न राहता पर्यावरण रक्षणाबरोबरच ते एक उत्पन्नाचे साधन बनू शकेल.
घनकचरा निर्मिती

घन कचऱ्याची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण वा त्याचा दर्जा यावर नियंत्रण ठेवता येत नाही. परिणामी त्याची साठवण, वाहतूक व्यवस्था वा त्यावरील प्रक्रिया यांचे डिझाईन करण्यासाठी सांख्यिकी पद्धतींचा वापर करावा लागतो. साहजिकच ही व्यवस्था सर्व परिस्थितीत कार्यक्षम राहण्यासाठी अधिक लवचिक व सुसज्ज ठेवणेे आवश्यक ठरते. यासाठी लागणारी साधन सामुग्री, मनुष्यबळ व आर्थिक तरतूद बहुतेक नगरपालिकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. त्यामुळे कचरा पेटीतून भरून वाहणे, तेथेच कुजून दुर्गंधी पसरणे, पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होणे व शहरी परिसर अस्वच्छ दिसणे या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत. गोळा केलेला कचराही शहराबाहेर उघड्यावर टाकून दिल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असलेले बहुतेक ठिकाणी दिसून येते.
घन कचरा स्वत: वाहून जात नाही. तो उचलून न्यावा लागतो यामुळे प्रदूषण त्या जागीच मर्यादित राहत असले तरी न वापरातील सर्व जागा हळुहळू कचऱ्याने व्यापल्या जातात आणि प्रत्यक्ष कृतीशिवाय स्वच्छता होत नाही. केवळ कायदे करून वा नगरपालिकेची कार्यक्षमता वाढवून या समस्येचे निराकरण करता येणार नाही. याउलट लोकांची मानसिकता बदलली आणि त्यांनी जाणीवपूर्वक यात सहभाग घेतला तर एरवी अशक्य व खर्चिक वाटणारी ही योजना अत्यंत कमी खर्चात प्रभावीपणे यशस्वीपणे राबविता येईल.
घनकचरा निर्मिती

शहर घनकचरा निर्मिती
दिल्ली ४६०० मे. टन
चेन्नई ३५०० मे. टन
मुंबई ५००० मे. टन
पुणे १५२७ मे. टन
नागपूर ११०० मे. टन
नाशिक ४३५ मे. टन
कोल्हापूर २५० मे. टन
सांगली ५५ मे. टन